Wednesday, August 29, 2012

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर

विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भेटलो होतो
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडी


प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
माझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर भाळली होतीस
मनात होती वादळं पण अबोली माळली होतीस
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद

एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच तू केला होतास फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं कोण?

मी रडलो नाहीच फक्त हसलो खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
नियतीचं प्रेमाशी जमत नाही सख्य

अक्षता झेलत झेलत संसारात रमायचं
टाचांना कुरवाळत नभाशी बोलायचं
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह घेतील पुन्हा वेग

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर
तात्पर्य नसतं अश्या कथेला कधीच नसतो 'नंतर'
हळद मेंदी, सनई तिघी एकत्र नांदल्या
कवितेनं व्यथा सा-या सहीपाशी सांडल्या ...!

No comments:

Post a Comment